top of page

॥ नशीब, शहणपण वेळेत सूचलं ॥



गीताने आज कॉलेजला दांड़ी मारली होती .राकेशने तिला संध्याकाळी बागेत भेटण्याचे वचन दिले होते. आयुष्यात प्रथमच एका निवांत स्थळी ती राकेशला भेटणार होती .संध्याकाळी केव्हा एकदा मी राकेशला भेटेनं असं तिला झालं होतं .तिचं चंचल मन एक सारखं वा-यासारखं सैर-भैर इकडं-तिकडं धावत होत.ं आज सकाळी -सकाळी बाथरूम मध्ये अंघोळ करताना ती ''तुमचं-आमचं जमलं '' या दादा कोंडकेंच्या चित्रपटातील , "झाल्या तिन्ही सांजा करून शिनगार साजा वाट पहाते मी गं येनार साजन माझा ... प्रितीच्या दरबारीचं येणार सरदार मायेच्या मिठीचा त्यांच्या गळयात घालीन हार दिलाच्या देव्हाऱ्यात ,बांधीन मी पूजा .. वाट पहाते मी गं येणार साजन माझा " गाणं ती गात होती .मंजुळ आवाजात ती गाणं गात होती. गीताची आई सकाळी - सकाळी तिच्या वाडिलां साठी नाश्त्याची तयारी करीत होती .गीताचे वडील घरात बुटाला पाँलीश करीत होते. पोरीला गाणं गाताना पाहून श्यामरावांनी आपल्या सौभाग्यवतीला म्हणजेच रजनीला हाक मारली ," अग ये रज्जू ,जरा इकडे ये पाहू ? "गीताचे क्डील श्यामराव बायकोला प्रेमाने रज्जू म्हणायचे .पोहे करता -करता रजनी म्हणाली ,"काय हो,आज तुम्हाला झालय तरी काय? ऑफीसला जायचा बेत दिसत नाही वाटतं ." श्यामराव लाडात येत बायकोला म्हणाले ,"अग मला वाटलं तू चुकून बाथरूम मध्ये रेडिओ चालू करून ठेेवलाय की काय ?," छेs हो,रेडिओ काय बाथरूम मध्ये ठेवायची जागा आहे का ?" त्रासिक मुद्रा करून रजनी श्यामरावांना म्हणाली ," मग मी म्हणतो ,गाण्याचा आवाज कुणाचा येतोय?" श्यामरावांची बायको वैतागली होती .ती रागाला येत श्यामरावांना म्हणाली ,"अहो,तुमची लाडकी लेक गीता गाणं गातेय गाऊ दया की गाणं माझ्या पोरीला अहो,गाण्याच वय आहे तिचं ,ती नाही गाणार तर मग काय तुम्ही गाणार होय ? अहो लोक स्टेजवर गाणी गातात ' नाटकात, सिनेमात , ऑर्केस्ट्रात गाणी गातात . मग मी म्हणते , माझ्या पोरीनं बाथरूम मध्ये गाणं म्हटलं तर तुमचं काय जातं ? हे पोहे घ्या . बका बका खा आणि ऑफिसला जा . ऑफिसला जायला तुम्हांला वेळ होतोय ना ? घड्याळात बघा किती वाजले . " रजनी पुढे काही न बोलता रागा- रागाने निघून गेली . गीता ही श्यामरावांची एकुलती एक कन्या होती. लहानपणा पासून त्यांनी तिचा प्रत्येक हट्ट पुरवला होता . ती मागेल ती वस्तू ते तिला आणून द्यायचे . गीता लहान असताना अशीच एकदा वडीलांच्या बरोबर बाजारात गेली होती . तेव्हा ती जेमतेम आठ्- नऊ वर्षाची होती . श्यामराव गीताला एका खेळणीच्या दुकानात घेवून गेले . विविध रंगाच्या खेळणी त्या दुकानात होत्या . खेळण्यांच सौंदर्य बाल मनाला मोहवीत होतं . भरगच्च खेळण्यांनी ते दुकान भरलं होतं . जापानी , चिनी , अमेरीकी , जर्मनी , तसेच भारतीय अशा किती तरी देश विदेशातील खेळणी त्या दुकानात होत्या . श्यामराव मुलीला घेवून दुकानात शिरले . दुकानदार नेहमीचेच ओळखीचे होते . अनेक वेळा श्यामरावांनी त्या दुकानातून आपल्या पोरीसाठी खेळणी विकत घेतल्या होत्या . दुकानात प्रवेश करताच क्षणी , ‌ दुकानदार श्यामरावांना म्हणाले , " नमस्कार , श्यामराव भाऊ ? " .नमस्कार,नमस्कार,"श्यामराव म्हणाले.दुकानदाराने आपाल्या तोंड़ाचा पट्टा चालूच ठेवला "कस काय येणं केलं ? बरेच दिवस झाले तुम्ही माझ्या दुकानाकडे फिरकला नाही . काही खास विशेष ? " हातवारे करीत श्यामराव दुकानदाराला म्हणाले , "तसं विशेष असं काही नाही . आज पोरीनं जरा जास्त हट्ट केला म्हणून म्हटंल जाऊन यावं . तुम्हांला तर माहितच आहे की , माझी छकुली गीता किती हट्टी आहे . माझ्या पोरीची शाळा तुमच्या, दुकानापासूनअगदी हकेच्या अंतरावर आहे . शाळेत जाताना आणि येताना एक सारखं आपलं दुकानाचं निरीक्षण करीत असते . माझ्या छकुलीला खेळण्याचं भारीच वेड आहे . खेळणी म्हणजे तिचा जीव की प्राण . जर एखादी खेळणी तिला पसंद पडली आणी, मी तिला विकत घेऊन दिली नाही तर ती सगळ घर डोक्यावर घेते . कधी कधी ती शाळेत पण जात नाही . तासन् तास रडत बसते . काय म्हणावं तरी काय हिच्या बालहट्टाला .श्यामराव बोलता -बोलता एक क्षण थांबले आणि दुकानदाराला म्हणाले , अहो, परवाचीच गोष्ट घ्या ना . तुमच्या दुकानाच्या उजव्या कोपऱ्यात एक दुकान आहे बघा . " " रामभरोसे " शूज मार्ट , लेडीज स्पेशल तेच दुकान ना " . दुकानदार म्हणाले . "हो s हो ss तेच दुकान " _श्यामराव म्हणाले . पुढे काय झाले ते सांगा ." दुकानदार म्हणाले . श्यामराव अतिजलद म्हणाले ,"अहो ,होणार काय ,शाळेतून येताना पोरगी दुकानात गेली किंमत विचारून आली .संध्याकाळी मला मस्का -पाव लावत म्हणाली ,"चला ना,पप्पा दुकानात .मला एक उंच टाचेची सँडल हवी आहे. आत्ताच हवी आहे .उठा ना पप्पा ,चला ना पप्पा " तिच्या वर्गात बऱ्याच श्रीमंत मुली आहेत . एखादया मुलीच्या पायात बघितली असेल .मला तिचा क्षणभर रागआला .पण काय करणार ?एकुलती एक पडली ना? माझ्या काळजाचा तुकडा आहे अहो,पैशा शिवाय या जगात काय होतं का पैशाशिवाय माणसाच पान ही हालत नाही प्रेम ब्रेम सगळं ठीक आहे हो .पण पैशाचा काय माणसाला या जगात सगळी सोंग-ढोंग करता येतात पण पैशाच सोंग करता येतं नाही .अहो माझा पगार पण झाला नव्हता .हे तिला कुठं कळ्तं . मी तिला म्हणालो ,"हे बघ छ्कली ,माझा पगार झाला की मी तुला घेऊन देतो .मी असे म्हणाल्या बरोबर स्वारी रुसून बसली . कोपऱ्यात जाऊन रडत बसली . मला म्हणाली ,"नाही मला आत्ताच घेऊन दया,नाही घेऊन दिली तर मी जेवणार नाही ." नुकताच कुठे मी ऑफीस मधून आलो होतो. बॅग खाली ठेवली कसा -बसा घशाखाली चहा ओतला. पोरीला म्हणालो," चल बाई ,तुला घेऊन देतो .मग काय पोरगी खुश .लगेचयेऊन माझ्या गळ्यात पडली .पोरीला घेऊन लगेच दुकानात आलो .तिला दोनशे रूपयाची उंच टाचेची सँडल घेऊन दिली . ती त्याच दिवशी आपल्या मैत्रिणींना दाखवून आली . काय सांगू तुम्हाला दोन -चार दिवसात तिने सँडल तोडून पण टाकली" .दुकानदार गालातल्या -गालात हसत श्यामरावांना म्हणाले ,"अहो श्यामराव चालायचच ,किती केलं तरी पोरीचीच जात . अजून खूप लहान आहे . तिचे हट्ट नाही पुरवायचे तर कोणाचे पुरवायचे ?बायकोचे ?" दोघेही खळखळून हसायला लागले .हसता -हसता दुकानदार श्यामरावांना म्हणाले ," बोला श्यामराव ,कोणती खेळणी दाखवू ?चिनी,जापानी,जर्मनी,की भारतीय ?" श्यामराव हातवारे करीत म्हणाले ," अहो,मला काय दाखवता,दाखवा की माझ्या पोरीला ?" दुकानदाराने श्यामरावांच्या पोरीला जवळ घेऊन तिला प्रेमाने विचारले ,"बोल बाळा,तुला कोणती खेळणी दाखवू ?" श्यामरावांची पोरगी गीता दुकानदाराला म्हणाली ,"मला की नाही काका ,त्या कोपऱ्यातली खेळणी दाखवा ?" दुकानदार क्षणाचाही विचार न करता म्हणाले,"बेटा हा तर जपानी बाहुला आहे ? तुला तर बाहुली पाहिजे ना खेळायला?" गीताने एक क्षण वाडिलांच्याकड़े एक क्षण दुकानदाराकडे पाहिले . क्षणभर विचार करून गीता दुकानदाराला म्हणाली ,"नाही काका,मला किनई हा जापानी बाहुला पाहिजे.माझ्या कडे इंडीयन बाहुली आहे . मला वाटतं काका हया जापानी बाहुल्याची आणि इंडीयन बाहुलीची चांगलीच जोडी जमेल ." दुकानदाराने सहजच विचारले ,"तू हा बाहुला घेऊन काय करणार गं?" गीता उडया मारीत म्हणाली ,"वेड़े कुठचे तुम्ही ? मी तो बाहुला घेणार आणि घरी गेल्यावर दोघांचेही लग्न लावून देणार. मग काका ,येणार ना माझ्या बाहुलीच्या लग्नाला .जरुर यायचं हां काका नाही तर जाल विसरून " श्यामराव हसले तसे दुकानदारही हसले .गीता खूपच हट्टाला पेटली होती. घेईन तर हाच जापानी बाहुला घेईन . नाही तर घेणार नाही .श्यामरावांनी पोरी पुढे हात टेकले श्यामराव हळूच दुकानदाराला म्हणाले," बोला राव,'किती किंमत आहे हया तुमच्या जापानी बाहुल्याची?" दुकानदार क्षणाचाही विचार न करता ते श्यामरावांना म्हणाले,"जास्त काही नाही ,फक्त चारशे रूपये .तुमच्या साठी मी तिनशेला देतो .दुसरे कोणी गिऱ्हाईक असते तर मी नक्कीच चारशे -पाचशे रूपये सांगितले असते . तुम्ही तर नेहमीचेच गिऱ्हाईक आहात तुमच्या कडून काय जास्त घ्यायचे ?" श्यामराव कसनुसा चेहरा करून दुकानदाराला म्हणाले ," अहो,तीनशे रूपये जरा जास्तच होतात ,असं नाही का तुम्हाला वाटतं ?" दुकानदार नाकातल्या -नाकात श्यामरावांना म्हणाले ,"अहो ,जास्त कसले म्हणता ,मी म्हणतो ,गीता तुमची एकुलती एक पोरगी ना ,पैसा काय,साले आज येते नि उदया जाते?पोरीची खुशी तेवढी महत्त्वाची. पैसा काय नंतर दिला तरी चालेल. तुम्ही काय पळून थोडीच जाणार ? पगार झाल्या नंतर दिले तरी चालतील ." श्यामरावांनी खिशात हात घालून पाकिट बाहेर काढले त्यातून दुकानदाराला दोनशे रुपये दिले आणि, म्हणाले,," हे बघा, आता मी दोनशे रुपये देतो. पगार झाल्या नंतर बाकीचे देईन. चालेल का?" " हो ,हो,चालेल ना, मी कुठे नाही म्हणतो तुम्ही तर आपलेच माणूस .कवा पण दया .''दुकानदार म्हणाले. श्यामरावांनी पोरीचे किती तरी हट्ट पुरवले होते. लहानपणी पोरीला जे-जे हवे होतें ते-ते त्यांनी आणून दिले . श्यामरावांची एकच इच्छा होती की ,पोरीनं खूप शिकावं ,शिकून मोठंठ व्हावं .गीताला जेव्हा दहावींच्या परीक्षेत फक्त साठ टक्के गुण मिळाले होते ,तेव्हा ते थोडे नाराज झाले होते .सायन्सना तिला अॅडमिशन घेऊन दयायचे होते . परंतू मार्क्स कमी असल्यामुळे तिला सायन्सला अॅडमिशन मिळाले नव्हते . गीताची पण सायन्सला जाण्याची इच्छा नव्हती फरक फक्त एवढाच होता की,श्यामरावांनी आपली इच्छा पोरीवर लादली होती. हायस्कूल मध्ये असताना ती फार हुशार होती. क्रिकेट ,लंगडी,खो -खो,धावणी,कबडड़ी इ. खेळात तिला हमखास बक्षिस मिळायचे " कबडड़ी " हा तिचा सर्वात आवडता खेळ होता.गीता जेव्हा ढ़िगांनी बक्षिस घरी घेऊन यायची तेंव्हा श्यामरावांच्या आनंदाला पारावार उरायचा नाही. तिच्या आईला खूप -खूप आनंद व्हायचा .गीताला सायन्सला अॅडामिशन मिळाले नव्हते ,तेव्हा श्यामरावांना खूप वाईट वाटले . त्यांना वाटायचे पोरीनं जरा थोडा जास्त अभ्यास केला असता तर नक्कीच तिला सायन्सला प्रवेश मिळाला असता .शेवटी श्यामरावांचा नाईलाज झाला. तिला आर्टसला अॅडमिशन घेऊन दयावे लागले ग़ीताच्या ही मनासारखे झालें होते . एकीकडे गीताला खूप आनंदही झाला होता .सर्व काही तिच्या मना सारखे घडतं होते . म्हणतात ना जे होते ते चांगल्या साठीच होते . रविवारचा दिवस होता श्यामराव अंघोळ आणि देवपूजा आटोपून गीताच्या बेडरूम मध्ये गेले .बघतात तर काय गीता अजून झोपलेलीच होती .गीताला सकाळी - सकाळी तोंड न धुता ,ब्रश न करता बेड - टी लागायचा .याच एका कारणावरून आईने एकदा तिला खूप झापाले होते .थोड़ा प्रसादही 'दिला होता . तेव्हा ती बारावीत शिकत होती".तिच्या वर्गातली तिची एक मैत्रिण होती. 'तिचे नाव श्यामली .श्यामलीचा मोठा भाऊ अमेरीकेत नोकरी करायचा .अमेरींकेहून घरी आला की तो रोजच सकाळी -सकाळी बेङ - टी घ्यायचा; तेव्हा पासून श्यामलीला बेड -टी ची सवय लगाली होती. श्यामली अधून - मधून गीताला आपल्या घरी घेऊन यायची .श्यामली सायकॉलॉजीच्या नोट्स काढ़ायची. श्यामली गीताला आपल्या घरी राहण्याचा आग्रह करायची ,तेव्हा गीता आईला घरी फोन करून सांगायची की,"आई मी आज येणार नाही ,माझी वाट पाहू नको. मी आज श्यामलीकडेच राहणार आहे .आई अगं पप्पांना पण सांग. नाही तर ते माझी फुकटची काळजी करत बसतील " गीता खूप लाडात वाढल्या मुळे तिची आईपण काही आडेवेडे न घेता तिला श्यामलीच्या घरी राहण्याची परवानगी दयायची. श्यामली आणि गीता दोघीही मिळून मन लावून अभ्यास करायच्या .श्यामलीला सकाळी -सकाळी बेड -टी लागते हे पाहून गीताला आश्चर्य वाटले .श्यामलीने गीताला एकदा खूपच आग्रह केला होता .ती गीताला त्या वेळी म्हणाली होती ," अग पिऊन बघ, छान लागतो ,तुला पण आवडेल ." तेव्हा मैत्रिणीच्या आग्रहा खातर गीताने बेड -टी घेतला होता .तिला चहा खूपच आवडला होता .तेव्हा पासून तिला जी सवय लगाली ती लगाली .गीताचे वडीलही ऑफीसला जाण्या अगोदर लाडक्या लेकीसाठी न चुकता बेड -टी घेऊन जायचे . विचारांच्या नशेत श्यामराव तरर्र .... चहा घेऊन ते गीताच्या बेडरूम मध्ये गेले .तिला हाक मारली.वडीलांची हाक ऐकून गीता उठली .चादर बाजूला सारीत ती वडीलांना म्हणाली ," गुड मॉनिंग पप्पा "गीताच्या हातात चहाचा कप देत ते तिला म्हणाले, " गुड मॉर्निग बेटा,झाली का झोप का ?कॉलेज काय म्हणतं माझ्या छकुलीचं ?"चहा पिता -पिता गीता वडिलांना म्हणाली ,"पप्पा,कॉलेज ना,माझे खूपच चांगले चालले आहे .कॉलेज मधील प्रेफेसरही खूपच छान शिकवितात . मला कसलेही टेन्शन नाही .खावं -प्यावं मस्त मजे मध्ये राहावं. कॉलेज लाइफ इज वंडरफूल लाइफ ." पोरी जवळ जात श्यामराव म्हणाले ," बेटा तू बी .ए .झाल्या नंतर काय करणार ?,सहजच विचारल ,माझ्या मनात आलं म्हणून. ".गीता चहाचा एक घोट घेत म्हणाली ,''काय करणार म्हणजे ? हा काय प्रश्न झाला तुमचा पप्पा ?अहो,मी बी.ए झाली की एम ए करणार ,मग एम .फिल ,पी .एचडी .नाहीतर बी .एड ,एम एड का काय ते म्हणतात ते करणार ?" एका दमात गीताने सगळं सांगून टाकलं . गीताचे वडील श्यामराव आश्चर्याने गीताकडे पहातच राहिले .थोडा वेळ थांबून ते म्हणाले ,"म्हणजे तुला प्रोफेसर व्हायचय तर.?" " अर्थातच , "गीता म्हणाली . श्यामरावांनी दुसरा प्रश्न पोरीला विचारला , " बी . ए . ला तू कोणता स्पेशल विषय घेणार ? " " सायकॉलॉजी पप्पा " गीता म्हणाली . श्यामरावांनी पोरीच्या डोक्यावरून हात फिरवला. एक क्षण थांबून ते गीताला म्हणाले , " वाह ! फारच छान झाले मग . तुझ्या साठी मला एखादा चांगला प्रोफेसर नवरा शोधावा लागेल ?" " कशासाठी ? " गीता हसत म्हणाली . " तुझ्या लग्नासाठी " गीता पलंगावर बसली होती .ती उठली आणि वडीलांना म्हणाली , " काय हो पप्पा , एवढयात काय तुम्हाला घाई झाली माझ्या लग्नाची . अजून माझे बी .ए. पण कंप्लीट झाले नाही . घरातून मला लवकर हाकलून देण्याचा विचार आहे का तुमचा ? जा मी नाही बोलणार तुमच्याशी ?" एवढे बोलून ती रडायला लागली . श्यामराव पोरीला जवळ घेऊन समजावून सांगत होते . "तसं काही नाही बघ. माझे पण रिटायरमेंटचे दिवस जवळ आले . तीन -चार वर्षात मी रिटायर होणार . मग आता पासूनच नको का तुझ्या साठी घर जावई शोधायला " . गीता वडीलांच्या जवळ आली . वडीलांचा डावा हात आपल्या हातात घेत ती म्हणाली , " पप्पा , केवढा विचार करता तुम्ही माझ्या लग्नाचा . माझ्या लग्नाचा विचार करणं सोडून दया . मी इतक्यात लग्न करणार नाही . माझं ही काही स्वप्न आहे . ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय मी माझ्या लग्नाचा साधा विचारही करू शकत नाही . " गीता पुढे एक अवाक्षर ही न बोलता रागा- रागाने निघून गेली .गीताचे कॉलेजही मजेत चालले होते . ती कॉलेज मध्ये खूप हुशार होती . कॉलेजच्या प्रत्येक ऑक्टीही टी मध्ये ती भाग घ्यायची . कॉलेज मध्ये ती कबड्डी चॅपियन होती . ती ज्या संघात होती तो संघ हमखास जिंकायचा . कॉलेजच्या वार्षिक स्नेह संम्मेलनात देखील ती भाग घ्यायची . तिचा आवाजही खूप गोड होता . तिच्या आवाजाचे सारे जण कौतुक करायचे . ती मुड मध्ये असली की छान गायची . कॉलेजच्या धावपळीत दोन वर्ष केंव्हा निघून गेली हे तिचे तिलाच कळले नाही . ती एस .वाय.बी.ए. ला केंव्हा आली हे ही तिलाच कळले नाही . गीता बी .ए च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती . तेव्हा तिच्याच कॉलेज मधील तिच्याच वर्गातील राकेश नावाच्या मुलावर तिचे प्रेम बसले होते.राकेश चाणाक्ष तसेच हुशार मुलगा होता . वक्तत्वस्पर्धा ,निबंधस्पर्धा तसेच काव्यस्पधैत त्याला हमखास बक्षिस मिळायचे तो शीघ्र कवी होता. बसल्या -बसल्या त्याला कविता सूचायच्या . तो कोणत्याही विषयावर कधीही ,केव्हाही आणि कुठेही कविता करायचा. कॉलेज तरूण ,तरूणी त्याला' शीघ्र कवी ' म्हणून हाक मारायचे .त्यालाही कधी राग यायचा नाही .एकदा कॉलेजने 'स्व रचित' कवितांचा कार्यक्रम ठेवला होता. इयत्ता ११ वी ते बी. ए पर्यंतच्या बऱ्याच मुला -मुलींनी भाग घेतला होता राकेशने तेव्हा एक कविता सादर केली होती ग़ीता त्या वेळेला केस मोकळे सोडून आली होती .मोकळ्या केसात गीताच सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं. गीता त्या वेळी फक्त एक रसिकप्रेक्षक म्हणून आली होती. तिला राकेशची खास कविता ऐकायची होती . हया कार्यक्रमात राकेशने एक सुंदर कविता सादर केली होती . " सखी,तुझ्या मोकळ्या केसात माझे मन गुंतले, सखी मी तुझ्यावर कधी प्रेम केलं ते माझे मला न कळले सखी तुच माझे सर्वस्व आहे,हे आज मला कळले." जेव्हा निकाल जाहिर केला तेव्हा राकेशच्या या कवितेला प्रथम क्रमांक आला होता. कॉलेजच्या बक्षिस समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्याला एक चांदीचा कप आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले होते .गीता राकेशच्या कवितेवर ,त्याच्या सौंदर्यावर ,त्याच्या हुशारी वर फिदा झाली होती .गीता मनापासून राकेशवर प्रेम करायची .कॉलेजच्या मुला -मुलींना त्यांचे हे गुपित माहित होते .एक क्षण जरी राकेश दिसला नाही तर गीता अस्वस्थ व्हायची .राकेश कधी गीताला बागेत ,कधी कॉलेजच्या कॅटींन मध्ये ,कधी कॉलेजच्या लायब्ररी मध्ये ,कधी इकडे ,कधी तिकड़े भेटायचा . बरेच दिवस झाले,गीता राकेशला भेटली नव्हती ,आज जेव्हा राकेश कॉलेज मध्ये आला होता ,तेव्हा राकेशने गीताला नेहमी भेटतो त्या बागेत भेटण्याचे वचन दिले होते . आज राकेशही तिला भेटणार होता म्हणून, गीतालाही खूप आनंद झाला होता .संध्याकाळची वेळ झाली होती .बागेत राकेशला भेटण्या आधी त्याला एक फोन करुन पहावा असे तिला वाटले .चार -पाच महिन्यापूर्वी गीताला तिच्या वडिलांनी एक नवीन मोबाइल फोन घेऊन दिला होता .गीता पलंगावर बसली होती .ती जागेवरून उठली फोन पर्स मधून बाहेर काढला ,आणि 'तिने लगेच राकेशला फ़ोन केला 'तिकडून आवाज आला . " हॅलो , कोण बोलतयं १ " गीताने राकेशचा आवाज ओळखला होता . ती राकेशला रागारागाने म्हणाली , " अरे बावळटा , कोण म्हणजे काय ? मी गीता बोलतेय . " " हॅलो . डार्लिंग . कशी आहेस तू १ " - " .डार्लिंग , बिर्लिंग काय म्हणतोस ? मला सांग आज आपण बागेत भेटावयाचे ठरले होते ना ? " " हं , माहिती आहे " पुढे बोल ''. " म्हणजे काय आज तू मला संध्याकाळी भेटणार नाही ? " " सॉरी डार्लिंग आज मी नाही येऊ शकत . आज माझी दुसरी कडे अपॉइन्मेंट आहे ." . " दुसरी कडे म्हणजे ? " " मी नाही सांगू शकत " - " याचा अर्थ तुझं माझ्यावर प्रेम नाही . " . " मी असं कुठे म्हणालो . " " याचा अर्थ मी काय समजायचा " . - . " तुला हवं ते समज . " . " तुला प्रेम म्हणजे खेळणं वाटलं का रे ? " . वापरलं आणि फेकून दिलं " . . " आय अॅम सो सॉरी . आज माझा तुझ्याशी बोलण्याचा अजिबात मुड नाही . " " बरोबर मुड कसा असणार ? दुसरी कोणी तरी भेटली असणार ? " " ये तुझी पॅक पॅक बंद कर .मला आता तुझ्याशी बोलायला अजिबात वेळ नाही" अचानक राकेशने मोबाईल बंद केला. गीताने ही राकेशला पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला नाही. गीता एक सारखा विचार करीत होती की, राकेश माझ्याशी अस कसं वागला. खरचं त्याच दुसरी कडं काम होत की , आपलं मला गंडविण्यासाठी त्यानं काही तरी बहाणा केला ? आज पर्यंत राकेश अस कधी वागला नाही. मग मी म्हणते तो आज असं कस वागला. गीता विचाराच्या चक्रीवादळात पूर्णपणे गुरफटून गेली होती. विचारांच्या तंद्रीत असताना दारावरची बेल कोणी किती वेळा वाजवली याचे ही तिला भान राहीले नाही. वारंवार जेव्हा बेल वाजत होती, तेव्हा ती कुठे भानावर आली. तिने पाहिले की बाहेरुन कोणी तरी बेल वाजवत आहे. गीताने दरवाजा उघडून पाहिलं तर तिची मैत्रिण श्यामली आली होती. आत आल्या आल्याच श्यामली गीताला म्हणाली " हाऊ आर यु? बरी आहेस ना? " " आय अॅम फाईन " " आज मुड ठिक नाही वाटतं तुझा? "- " अग, हे पुरुष , स्वतःला समजतात तरी कोण ? हवं तेव्हा वापरायच आणि हवं तेव्हा फेकून द्यायच.एकजात इथून- तिथून सगळे पुरूष एका माळेचे मणी " '' तू कोणा बद्दल बोलतेस? ओ , आय सी, तू राकेश बद्दल बोलतेयस ना? "- " होय मी त्याच्या बद्दलच बोलतेय " " अग , मी म्हणते , तू सगळ्या पुरुषांना का म्हणून दोष देतेस? राकेश वाईट आहे, म्हणून सगळे पुरुष वाईट आहे असं का तुला म्हणायचंय ?" - " आय अॅम सॉरी, बट मला असं म्हणायच नव्हंत. पण मी तरी काय करु? त्यानेच माझ्यावर ही म्हणण्याची पाळी आणली " " अग वेडा बाई , ज्या राकेशवर तू मनापासून प्रेम केलं. पण तुझा तो प्रेमवीर राकेश शेवंतीला घेऊन सिनेमाला गेलाय म्हणे,तीन ते सहा .संध्याकाळी कुठेतरी फिरायला घेऊन जाणार आहे तिला. रात्री कुठल्या तरी मस्त हॉटेल मध्ये जेवायला पण जाणार म्हणे. अग थोड्या वेळा पूर्वी मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता " - " कोणाचा ? राधिकाचा ? "- " हो ss हो sss तिचाच? " " काय म्हणाली ती " - " ती मला फोनवर सांगत होती ,म्हणे ,गीताचा प्रेमवीर राकेश शेवंतीला घेऊन सिनेमा पाहत बसलाय . अगदी एकमेकांच्या गळ्यात- गळे घालून सिनेमा पाहतायेत म्हणे ! मध्यंतरानंतर चिप्स का काय म्हणतात " "बटाट्याचे वेफर्स " गीता म्हणाली . " होs होss तेच ते एकमेकांना भरवत होते . हे सगळं मला राधिकाने फोनवर सांगितले ती म्हणाली ,ज्या थिएटर मध्ये राकेश आणि शेवंती सिनेमा पाहायला गेले होते .त्याच थिएटर मध्ये ती पण सिनेमा पाहायला गेली होती .'तिने हे सगळं आपल्या डोळ्याने पाहिले .तुला म्हणून मी सांगायला आले .,कारण तू माझी जीवा -भावाची मैत्रीण आहेस हे सगळं तुला सांगताना मला फार काही आनंद होतं नाही . ,माझ्यावर रागवू नकोस,बरं का गीता ?नाही तर फुकट्चं तिचा राग माझ्यावर काढशील". श्यामलीने एका दमात जे सांगायचे ते सगळे गीताला सांगून टाकले . श्यामलीकडून हे सगळं ऐकताना गीताची तळ्पायाची आग मस्तकात गेली होती ती रागाने लालबूंद झाली होती ओठावरची लाली तिच्या गाली आली होती . गीताला हे ही कळून चुकले होते की,राकेश किती नालायक आहे.किती डॅम्बिस आहे. गीताने मना मध्ये पक्का निश्चय केला की,या पुढे प्रेम-ब्रेम सगळं बंद .कसल्याही फंदात पडायचे नाही फ़क्त अभ्यास आणि अभ्यास करायचा .पप्पांना प्रोफेसर बनून दाखवायच.पप्पांचे आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं. गीतानेही आपल्या मनातील विचार श्यामलीला बोलून दाखवले . ‌श्यामली घरी जाता - जाता गीताला एवढचं म्हणाली," अग नशिब माझं,शहाणपण तुला वेळेत सूचलं ". लेखक - अशोक कुमावत

भ्रमणध्वनि - ९९६९५८४९६६

मुंबई -मालाड (पूर्व )

Email: ashokkumawat010@gmail.com


विश्व मराठी परिषदेचे टेलीग्राम चॅनेल सबस्क्राईब करा

610 views0 comments

Recent Posts

See All
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page