top of page

विश्व मराठी परिषद -  संकल्पना आणि भूमिका 

            स्वतंत्र भारतामध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. महाराष्ट्राचा ज्ञात इतिहास इसवी सनाच्या पूर्वी दुसऱ्या शतकापासूनचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम ही महाराष्ट्राची आद्य दैवते आहेत. एक भारतीय व्यक्ती, एक हिंदू व्यक्ती राजा बनू शकते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या असिम कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवले. इ.स.च्या १८व्या शतकावर मराठ्यांचेच राज्य होते आणि जवळपास संपूर्ण भारतात मराठ्यांचेच वर्चस्व होते. दिल्लीचा मुघल बादशहा नामधारी होता. दुसर्‍या बाजीराव पेशवा इ.स. १८१८ मध्ये पराभूत झाला तेंव्हाच खर्‍या अर्थाने भारतावर आपले राज्य स्थापन झाले अशी इंग्रजांची खात्री झाली. इंग्रजांनी भारत ताब्यात घेतला तो मराठ्यांकडून घेतला. स्वपराक्रमाने, स्वकर्तृत्वाने मराठ्यांनी संपूर्ण भारत पादाक्रांत केला होता. पाश्चात्य इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडर, हनिबाल, ज्युलियस सीझर, नेपोलियन इ. जगप्रसिद्ध सम्राटांसोबत केलेली आहे.

            मात्र १८१८ ते १९६० या काळामध्ये बरीच उलथापालथ झाली. इंग्रजांचे राज्य होते. त्यांना सर्वात जास्त प्रतिकार मराठी माणसांनीच केला.  मग ते १८५७चे स्वातंत्रयुद्ध असो की चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके यांचा लढा असो, स्वा. सावरकर यांचा क्रांतिकारी मार्ग असो कि सत्याग्रहाची चळवळ असो. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे इ.स. १९२० पर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्य़ात मराठी माणसांचाच पुढाकार होता आणि नेतृत्व होते. अर्थात देशातील इतर प्रांतातील बांधवही यामध्ये सहभागी झाले होते. म. गांधी, सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणावर मराठी बांधव सहभागी झाले होते. मात्र जेंव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि इंग्रजांनी भारताला भारत परत दिला, तेंव्हा केंद्रीय नेतृत्वामध्ये मराठी माणसाला दुय्यम स्थान दिले गेले. कोणतेही कारण नसताना कर्तृत्ववान मराठी माणसांची सातत्याने अवहेलना केली गेली. अर्थमंत्री धनंजय गाडगीळ, यशवंतराव चव्हाण अशा कितीतरी अभूतपूर्व क्षमता असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या वकुबाप्रमाणे न्याय मिळाला नाही.  त्यांचा सातत्याने दुस्वास केला गेला. मराठी माणसाच्या हक्काची  मुंबई मिळवण्यासाठी सुद्धा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी करावी लागली आणि त्यासाठी १०६  हुतात्म्यांना बलिदान करावे लागले .

 

  मराठी माणूस हा स्वभावत: काटक, पराक्रमी, धाडसी, हरहुन्नरी आहे, निस्वार्थी, कमालीचा सोशिक आणि सहनशील आहे. कदाचित जरा जास्तच सोशिक आहे. त्याचा परिणाम म्हणजे तो इतरांचाच जास्त विचार करतो. त्याचे नेहमीचे दृष्य उदाहरण म्हणजे इतर  भाषिक बांधवांबरोबर बोलताना त्यांना त्रास होऊ नये म्हणून तोच मराठी ऐवजी हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलायला सुरवात करतो.  एकदा कधीतरी गमतीने बोलताना प्रख्यात लेखक पु. ल. देशपांडे म्हणाले होते की मराठी माणसे खेकड्यासारखी असतात. ती जन्मत: एकमेकांचे पाय ओढणारी असतात.  ते सहज विनोद म्हणून असे बोलले होते. मात्र दुर्दैवाने मराठी माणसाने ते खरेच मानले. तो स्वत:ला खेकडाच मानू लागला. एका विचित्र मानसिक न्यूनगंडामध्ये मराठी माणूस फसला आहे. मराठी माणसाला राष्ट्रिय आणि वैश्विक पातळीवर सिंहाप्रमाणे पून्हा प्रस्थापित करणे हे विश्व मराठी परिषदेचे मुख्य उद्दीष्ट आहे.  अर्थात  मराठी माणसांमध्ये अनेक दोष आणि अवगुण आहेत हेही मोकळेपणाने मान्य केले पाहिजे. मात्र सातत्याने मराठी माणसाने दुय्यम भूमिका स्वीकारायची हे आता थांबले पाहिजे. चित्रपट असो वा खेळ, मराठी माणसांनी कायम सहाय्यक किंवा निम्न दर्जाची कामे करायची. मराठी माणूस म्हणजे घरगडी किंवा कपबश्या धुण्याचे काम करणारा या गोष्टी आता थांबल्या पाहिजेत. मराठी माणसाकडे कुत्सित नजरेने कुणी पाहता कामा नये. मराठी माणूस हलक्या दर्जाचा आहे, आळशी आहे, दुर्गुणी आहे असे कुणीही म्हणता कामा नये. यासाठी मराठी माणसांनी आता सिंहावलोकन करावयची गरज आहे. फक्त  इतरांना दोष देऊन, टीका करून, त्रागा करून, इतरांचे आणि आपल्याच बांधवांचे सातत्याने वाभाडे काढून चालणार नाही. आपले गुण आणि दोष यांचा अभ्यास केला पाहिजे. आपली दुर्बल स्थाने शोधून काढून त्यावर उपाययोजना केली पाहिजे. आपले सामर्थ्य विकसित केले पाहिजे. आज भारताबाहेर जगभरामध्ये सुमारे ६० हून अधिक देशांत सुमारे एक कोटी मराठी बांधव राहत आहेत. त्यांनी स्व-प्रयत्नाने, अविरत कष्टाने, हिमतीने, साहसाने फार मोठी प्रगती केली आहे. महाराष्ट्राबाहेर देशातील इतर राज्यातही सुमारे अडीच कोटी मराठी बांधव रहात आहेत. महाराष्ट्राची लोकसंस्ख्या बारा कोटी आहे. या साडे पंधरा कोटी मराठी बांधवांपैकी किमान १२ कोटी बांधवांची मातृभाषा मराठी आहे. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतामधील इतर राज्यांमध्ये जे मराठी बांधव आहेत; त्यांनाही मराठी भाषा, साहित्य,  संस्कृती आणि मराठी माणसांच्या विकासाविषयी  रुची आहे. इतकेच नव्हे, तर अगदी साता समुद्रापलीकडे ज्या मराठी बांधवांनी मराठीचा झेंडा डौलाने फडकत ठेवला आहे; त्या अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्त्राइल, आखाती देश यांतील मराठी बांधवांनाही मराठी साहित्य जगतातील घडामोडींविषयी औत्स्युक्य असते. लेखक, कवी, वाचक, उद्योजक, व्यावसायिक, संशोधक, शेतकरी, उत्पादक,  कलाकार, समीक्षक, अभ्यासक, वक्ते, प्राध्यापक, ग्रंथकार, प्रकाशक, श्रोते, ग्रामिण कलाकार, गायक, संगितकार, खेळाडू,  विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी, समाजाच्या सर्व स्तरांतील बंधू - भगिनी  साहित्य, संस्कृति आणि उद्योजकताविषयक उपक्रमांच्या निमित्ताने  आपल्या कार्य - कर्तृत्वाला कोणती संधी मिळते का, याची चाचपणी करीत असतात.

गेल्या काही वर्षांत संपूर्ण जगामध्ये सर्वच क्षेत्रांत संवाद – माध्यमांच्या सुलभ व स्वस्त तंत्रज्ञानाने आमूलाग्र बदल घडविले आहेत. तंत्रज्ञानामुळे जगभरातील माणसांना जवळ आणले आहे. त्यांना एकमेकांबरोबर मुक्त संवाद साधता येतो आहे. परस्परांजवळ पोहोचण्यासाठी, कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी अधिक वाव निर्माण झाला आहे. इंटरनेट, ई-मेल, फेसबुक, व्हॉट्स अप, यु ट्युब, इंस्टाग्राम, किंडल, विविध प्रकारची अप्स, ऑनलाईन वितरण, ऑनलाईन सादरीकरण, ऑनलाईन शिक्षण,  डिजिटल तंत्रज्ञान, इ. अनेक आधुनिक तांत्रिक आविष्कारांमुळे मानवी जीवनाची जवळपास सर्व क्षेत्रे पूर्णत: ढवळून निघाली आहेत. अशा वेळी १२ कोटी मराठी बांधवांनी  एकमेकांना सहकार्य करून सक्षम, संपन्न आणि समृद्ध असा वैश्विक मराठी समाज निर्माण केला पाहिजे. आम्ही प्रथम शंभर टक्के भारतीय आहोत. मात्र नंतर मराठी आहोत अशी आमची भूमिका आहे.  आपले कोणाशीही भांडण नाही,  कोणाविषयी तक्रार नाही. भूतकाळाबद्दल आम्हाला निरर्थक वाद घालायचे नाहीत. आमच्या चुका सुधारून आम्हाला उज्ज्वल भविष्यकाळ घडवायचा आहे. यासाठी विश्व मराठी परिषद कार्यरत  आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञान आणि संवाद साधने यांचा अतिशय चतुराईने आणि परिणामकारक वापर करून मराठी माणसाचा विकास करायचा अशी विश्व मराठी परिषदेची मूलभूत संकल्पना आहे. त्याचा मुख्य उद्धेश एकमेकांच्या मदतीने असा जागतिक मराठी समाज घडवायचा की मराठी माणसाला सर्वत्र सन्मान मिळेल, मान्यता मिळेल, त्याची प्रगती होईल. विशेषत: तो आर्थिक दृष्ट्या संपन्न आणि समृद्ध होईल.  त्याच्यातील आत्मविश्वास वाढेल. तो समर्थ होईल. २१ व्या शतकातील शिवबांचे मावळे म्हणून तो जगभर पराक्रम गाजवील. यासाठी साहित्य, संस्कृती आणि उद्योजकता या तीन आयमांना केंद्रस्थानी ठेवून विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. सामर्थ्यवान मराठी माणूस घडवण्यासाठी यातून फार मोठे बळ मिळेल, असा विश्व मराठी परिषदेला विश्वास वाटतो..

मराठी भाषेतील अनेक जाणकार साहित्यिक, बुद्धिजीवी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते,   उद्योजक, व्यावसायिक, पत्रकार, तंत्रज्ञ, रसिक आणि सुजाण नागरिक,  इ. यासाठी एकत्र आले आहेत. यातून एकत्रित प्रयत्नाने सामूहिक मराठी मानसामध्ये विधायक सुधारणा घडविता येतील आणि त्याला एक सकारात्मक दिशा देता येईल, असा विश्वास वाटतो. मराठी जगतामध्ये आमूलाग्र बदल घडवून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोट्यावधी मराठी बांधवांमध्ये एक भाषिक, साहित्यिक, सांस्कृतिक, भावनिक आणि उद्योजकिय सहकार्याचा  सेतू तयार करणे, त्यांच्या मनामध्ये एक स्फुल्लिंग चेतवणे आणि त्यातून भावी पिढीसाठी एक अलौकिक वारसा निर्माण करणे, असे क्रांतिकारी स्वप्न ‘विश्व मराठी परिषद’ पाहत आहे.

सक्षम, संपन्न आणि समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंड तयार करणे हे विश्व मराठी परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी विविध देशातील महाराष्ट्र मंडळे, बृहन महाराष्ट्र मंडळे, मराठी माणसांच्या संस्था, संघटना यांच्यामध्ये समन्वय साधणे. परस्पर सहकार्य करणे, माहितीची देवाणघेवाण करणे आणि विविध प्रकारचे नेटवर्किंग करणे अशा प्रकारचे कार्य विश्व मराठी परिषद करीत आहे. संधीचा गुणाकार, माहितीचा समन्वय आणि एकपेक्षा सहाय्य अशी त्रिसूत्री परिषद राबवित आहे. केवळ साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम या पलीकडे जाऊन उद्योजकता, रोजगार, संधी आणि आर्थिक विकास हे परिषदेचे आहे. 

प्रगती करा... नेटवर्कींग करा... नेतृत्त्व करा... समृद्ध बना... संपन्न बना...           

bottom of page