top of page

|॥ पांडुरंगाचा साक्षात्कार ॥|


माझ्या पांडुरंगावर माझी नितांत श्रद्धा . पांडुरंगाची प्रचिती मला या दोन वर्षात पदोपदी यायला लागलीय .हे तितकेच सत्य .पांडुरंगा शिवाय माझे पान ही हालत नाही .राहून -राहून माझ्या मनाला एक सारखे वाटते की पांडुरंगाचे आणि माझे पूर्वं जन्मीचे काही तरी नाते असले पाहिजे .मी पूर्व जन्मी त्यांचा छोटासा भक्त ,सेवेकरी तरी असेन .त्यांच्या चरणाशी बसून मी त्यांची सेवा करीत असेन .म्हणूनच की काय या जन्मी त्यांचा मला लळा लागला . लळा इतका की काय सांगू .

पांडुरंगा चरणी एकच मागणे मागावेसे वाटते की , ते म्हणजे ,

तुझे वेड लागू दे मला ,

आणिक काय मागू मी तुला ,रे विठ्ठला I

नको सोने -चांदी ,नको नाम -वैभव

मुखी माझ्या असू दे ,सदा तुझे नाव ,

तुझ्या नावाचे वेड लागू दे मला ,

आणिक काय मागू मी तुला, रे विठ्ठला II

कित्येकदा मला माझ्या विठू माऊलीने अप्रत्यक्षपणे विविध रूपात दर्शन दिले आहे.अशाच एका अनुभवाच्या प्रचितीचा प्रसंग .या वर्षीचा मला 'साहित्य रत्न पुरस्कार मिळाला होता .तशा आशयाचे पञ मला 'साप्ताहिक कोल्हापूर ' विशेषचे संपादक , पत्रकार मा .श्री. सुरेश शिंत्रेंनी पाठवले होते. कोल्हापूर 'गोकूळ ' दूध संघाचे अध्यक्ष मा . रविंद्र आपटे व मराठी सिनेतारका .मा.अंशुमाला पाटील यांच्या हस्ते १९ मे ला मला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार होते .साहित्य क्षेत्रात मी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले होते. सुरेश भाऊंना मी येतो म्हणून तसे सांगितले होते .सत्कारा निमित्त मी पाहिल्यांदाच कोल्हापूरला चाललो होतो . मला आनंद झाला होता .आनंद आणखी यासाठी झाला होता की , मला कोल्हापूरच्या अंबामातेचे दर्शन घेऊन परत येताना पंढरपूरला माझ्या पांडुरंगाचे दर्शन मला घ्यायला मिळणार होते . मोह मला पुरस्कारा पेक्षा पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीचा जास्त होता .१८ मे ला मी सायंकाळी ५:३० वाजता घरातून बाहेर पडलो .सुरेश शिंत्रे भाऊंनी मला त्यांच्या करी रोडच्या बी.डी .डी. चाळीत असलेल्या कोल्हापूर विशेषच्या कार्यालयात संध्याकाळी साडे सहा वाजे पर्यंत हजर राहायला सांगितले होते . बरोबर साडेसहा वाजता त्यांच्या कार्यालयात मी पोहोचलो . तेथून 7:३०च्या चांगभलं ट्रॅव्हल्सने दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता उत्तुरला पोहोचलो .साहित्यरत्न पुरस्कार माझ्यासह श्री.दिवाकर म्हात्रे, वसंत सकपाळ , श्री. शरद महाजन , एच .डी .पाटील , राधिका आचरेकर या आणि अशा अनेक मान्यवरांना मिळाला होता .उतरून आम्ही उत्तुर, कोल्हापूरचे प्रतिष्ठित व्यक्ती ,समाजसेवक ,उद्योजक मा . श्री.दादासो पाटील यांच्या बंगल्यात उतरलो .माझ्या सोबत साहित्यिका श्रीम .राधिका आचरेकर, तसेच पाटील मॅडम अशी साहित्यिक मंडळी सुद्धा होती .दादासो पाटील यांनी आमचा त्यांच्या बंगल्यात चांगलाच पाहुणचार केला . ते आम्हाला आमच्यातलेच एक वाटले.त्यांच्याशी बोलून भेटून मनस्वी मला खूप आनंद झाला . त्यांचं कुटुंब मनस्वी खूप प्रेमळ .सायंकाळी कार्यक्रम संपल्यावर उत्तुरहून कोल्हापूरला जाण्यासाठी म्हणून मी गडहिंग्लज कोल्हापूर ही एस .टी पकडली .निपाणी मार्गे साधारण पणे रात्री नऊ वाजता मी कोल्हापूर एस .टी (सी.बी.एस )स्टॅण्डला उतरलो .उत्तुर ते कोल्हापूर या दोन तासाच्या प्रवासा दरम्यान एस .टी .कंडक्टरशी माझी चांगलीच गट्टी जमली होती .या दोन तासात मी त्यांच्याशी केवळ आणि केवळ पांडुरंगा विषयीच बोलत होतो.कोल्हापूरला उतरण्या आधी त्यांनीच मला सांगितले होते की उतरल्यावर स्टॅण्डच्या बाहेर लागूनच तुम्हाला सीटी बस मिळेल .कोणत्याही बसने जा . अंबामाता मंदिर सांगा .एरव्ही रात्रीची वेळ आहे .रिक्षावाले तुमच्या कडून ७०-८० रूपये उकळतील .तुम्ही इथून सीटी बसने जर गेला तर तुम्हाला ८-१० रूपये भाडे लागेल . तेवढेच तुमचे पैसे वाचतील . वाचलेले पैसे तुम्हाला प्रवासात कामी येतील . "मला ते माझ्या मोठया भावा प्रमाणे समजावून सांगत होते .मी त्यांना हो म्हणालो .रात्री नऊ वाजता मी कोल्हापूर सीबीएस ला उतरून बाहेर बसस्टॉप जवळ येऊन थांबतो- न -थांबतो तोच माझ्या साठी बस हजर .बसला जास्त काही नाही आठ रुपये तिकीट होते .बस रिकामी होती .जणू काही पांडुरंगानेच ती माझ्या साठी पाठवली होती .१५-२० मिनीटात करवीर निवासिनी अंबामातेच्या मंदिरा जवळ येऊन मी पोहोचलो .मंदिर थोडे लांब होते . विचारत -विचारत मी थोडयाच वेळात मंदिरा जवळ आलो.. मंदिरात दर्शन लाईनीत तोबा गर्दी होती .मी मनात म्हणालो , " बहुतेक करून आज आपल्याला दर्शन न घेता विन्मुख परतावे लागते की काय ?माझ्याकडे बॅग होती .मंदिर संस्थांनचे लॉकर ऑफीस बंद झाले होते .मी मोठया पेचात

‌ पडलो . मनाला माझ्या हुरहुर लागून राहिली . हार वाल्याच्या दुकानात जाऊन त्याच्या कडून ओटीचे सामान घेतले . बॅग त्याच्याच कडे ठेवून मी निघालोच होतो. तेवढ्यात पाठीमागून त्याने मला हाक मारली . मी म्हणालो , " काय भाऊ ? "


" काही नाही , जरा लवकर या . "

मी म्हणालो , " का रे बाबा ! '

दुकान बंद व्हायची वेळ झालीय . १५-२० मिनीटात या . १०पर्यंत या म्हणजे झाले . "

" सर्वच दुकाने दहा वाजता बंद होतात की काय ? "

" हो ,जावा लवकर ,मुख दर्शनाच्या लाईनीतून दर्शन घेऊन या . "

मी न राहवून त्याला म्हणालो, " अहो पण ,मला देवीची ओटी भरायची आहे . "

" भरा ना , तुम्हाला कोण नाही म्हणतय .

अहो तेथे सेक्युरीटी वाले आहेत ना .त्यांच्या हातात ओटीच सामान दया.बाकी सर्व देवीवर सोपवून निर्धास्त रहा. आणि हो - - -"

"आणि काय " मी म्हणालो .

" दहा पर्यंत या नाही आला तर तुमची बॅग मी इथेच बाहेर ठेवून जाईन . तेव्हा तुम्ही जरा लवकरच या . "मी म्हणालो , "

तुमचे पैसे नाही घेणार का ,की तसेच जाणार "

" हो या तुम्ही . "

" मी ही त्याच्याशी जास्त हुज्जत न घालता मुख दर्शनाच्या लाईनीत जाऊन उभा राहिलो .दर्शन लाईन ही भली मोठी होती .अर्धा-एक तास मला सहज लागला असता .मी देवीच्या ओटीचे सामान सिक्युरिटी गार्डच्या हवाले सुर्पूद करून , " भाऊ ,देवी पर्यंत जाऊ दया . " एवढे बोलून दर्शन घेऊन मी करवीर निवासीनी च्या भव्य - दिव्य ,तेजस्वी मूर्तीचे रूप डोळयात साठवून बाहेर पडलो . हारवाला दुकान बंद करून माझी येण्याची वाट पहात उभा होता .ओटीचे पैसे देऊन बॅग घेऊन मी रस्त्याला लागलो .दोन -चार दुकानात सहजच म्हणून मी फेरफटका मारला .एक-एक वस्तु मी न्याहाळत होतो .खरं म्हणाल तर मंदिराच्या आवारातून माझा पाय निघत नव्हता .देवीची कृपा म्हणावी की काय .मी पहिल्यांदाच कोल्हापूरला आलो होतो ,आणि मी पहिल्यांदाच देवीचे दर्शन घेऊन मी कृत-कृत झालो होतो .एका दुकानात ५० रुपयाचा प्रसाद घेऊन मंदिराच्या बाहेर येऊन रिक्षाने छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला उतरलो .तिकीट काढून मी निर्धास्त झालो . गाडी विषयी चौकशी केली असता मला कळले की , 'सोलापूर एक्सप्रेस 'रात्री बारा वाजता सुटणार आहे . साडेदहा वाजले होते .माझ्याकडे वेळच वेळ होता . पोटात माझ्या कावळे ओरडत होते. बाहेर भज्यांच्या पाच -सहा गाडया लागल्या होत्या .गरमा -गरम भज्यांचा वास सुटला होता .मी कोल्हापूर विषयी बरच काही ऐकून होतो.सांगायचच झालं तर कोल्हापूरची चटपटीत भेळ , झणझणीत मिसळ ,तांबडा -पांढरा रस्सा ,कोल्हापूरचा गुळ , गुऱ्हाळं ,चित्रनगरी ,रंकाळा तलाव , कोल्हापूरची तालीम ,तालमीत कुस्ती खेळणारे पैलवान, छत्रपती शाहू महाराज ,त्यांच कार्य एक नव्हे अनेक गोष्टीं विषयी मी लहानपणा पासून ऐकत आलो होतो . आज प्रत्यक्ष कोल्हापूर पाहण्याचा मला योग आला होता .एक छान , सुंदर शहर .खरचं कौतुक करण्या सारखं अस शहर आहे कोल्हापूर .मिरच्या भज्या पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले .गरमा -गरम मिरच्या भजांवर मी यथेच्छा ताव मारला . मिरची भजी खाऊन तोंडात आग लागली की काय असे मला वाटले . भूक काही जाईना म्हणून मी रस्त्यावर येऊन चांगले हॉटेल कुठे दिसते का ते पाहू लागलो . रस्ता क्रॉस करून 'जनता भोजनालय ' माझ्या नजरेस पडले . व्हेज- नॉनव्हेज दोहोंची उत्तम व्यवस्था होती.हॉटेल मध्ये इतर बरेचशे पदार्थ होते पण तांबडया -पांढऱ्या रस्स्याने मला भुरळ घातली . उत्तूर येथे कार्यक्रमाच्या दिवशी दुपारी कोल्हापूर विशेषचे संपादक मा .श्री. सुरेश शिंत्र यांच्या समवेत मी एका घरगुती मेस मध्ये तांबडया -पांढऱ्या रस्स्याचा आस्वाद घेतला होता . त्या दिवशी खाऊनही मन भरले नाही म्हणून की काय मी पुन्हा खाण्यासाठी म्हणून हॉटेल मध्ये आलो होतो .मी ऑर्डर दिली .पुढच्या १५-२० मिनीटात वेटर माझ्या पुढ्यात ताट घेऊन हजर .वेटरने माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली., "साहेब ,खाऊन तर बघा . एक नंबर हाय .तुम्ही पुन्ह्यांदा मागसाला . सायब कुठलं कोल्हापूरचं का ? " मी म्हणलो,नाही "

" मग हो ,कुण्या पुण्या,मुंबई कडलं का ? " मी धीर गंभीर होत त्याला म्हणालो , "

पुण्या कडलं नाय .मुंबई कडलं "

" इकडं कुठं आलासा . कोल्हापूर बघायलासा की काय ? "

" नाही .मी उत्तुरला कामा निमित्त आलो होतो .. "

" बरं , बरं , सायब काय लागलं तर सांगा .आपल्या माणसाचं हॉटेल हाय .आपला माणूसच आपल्या माणसाची काळजी घेतो. नाय का ? "मला त्याच्या बोलण्यात प्रेम , आपुलकी आपलेपणा दिसून आला .वाटलं त्याला परत हाक मारून बोलावून घेऊन एक मस्त पैकी जादूची झप्पी दयावी . तो निघून गेला .मी एक घास खाल्ला .अहाहा ss अप्रतिम स्वाद होता .मी तांबडया- पांढऱ्या रस्स्यावर यथेच्छ उभा- आडवा हात मारला .जेवण करून बाहेर आलो .पोट गच्च भरले होते .बाहेर पानटपरी वर येऊन मसालापान घेऊन खात- खात स्टेशनला वर आलो . तिकीट आधीच मी काढून ठेवले होते .साडे आकरा वाजता प्लॅटफॉर्म नंबर ३ वर येऊन मी दाखल झालो .मी येण्याच्या आधी पासूनच गाडी आपल्याच तोऱ्यात उभी होती . जनरल कोच ,स्लिपर कोच आधी पासूनच हाऊसफुल्ल होते .मी चार- पाच डब्यात फेरफटका मारून आलो .कुठे बसायला जागा मिळते का म्हणून. ज्या -ज्या डब्यात मी जाऊन आलो त्या-त्या डब्यात प्रचंड गर्दी होती , सामान ठेवायच्या लोखंडी फळीवरही काही प्रवाशांनी ताणून दिली होती . मनात मी प्रचंड संतापलो.वाटले ह्यांच्या बापाची रेल्वे असल्यागत वागताहेत साले.जो-तो आपल्याला कशी जागा मिळेल , आपल्याला कसे झोपायला मिळेल याच विवंचनेत होता .क्षणभर मला प्रवासी स्वार्थी वाटले . खाली बसायच्या एका- एका सिटवर ६-७ जणांनी बसल्या- बसल्या पेंगायला सुरुवात केली होती . इकडे गाडी बरोबर बारा वाजता सुटणार होती .काय करावे ते मला सूचेचना .बाहेर येऊन मी प्लॅटफॉर्म वर असलेल्या बाकड्यावर येऊन बसलो . अंगात माझ्या नवीन पांढरा शर्ट होता तो मळू नये म्हणून मी बॅगेतून दुसरा मळका शर्ट काढून घातला . प्लॅटफॉर्म वर फारसी गर्दी नव्हती .मी निराश झालो होतो .मी बाकड्यावर बसून होतो .मनात माझ्या पांडुरंगाचे नामस्मरण चालू होते.थोडा वेळ नामस्मरण करून झाल्यावर मी मनात पांडुरंगाला म्हणालो , "हे माझ्या पांडुरंगा ! जरा लक्ष दे माझ्या कडे . "तसेही जेव्हा-जेव्हा मी प्रवासाला निघतो तेव्हा -तेव्हा माझा विठूराया माझ्या सोबत असतोच असतो . तोच माझी काळजी घेत असतो .यावेळी पण तोच काही तरी चमत्कार करेल असे माझे मन मला सांगत होते . गाडी ढळायला पाचेक मिनीटे शिल्लक असताना मी कसा -बसा डब्यात प्रवेश केला .आत गेल्या वर एका सिटवर पाच -सहा प्रवाशी बसले होते.सीटच्या कडेला एक मुलगा थोडासा ऐसपैस बसला होता.त्याच्या चेहऱ्यावरून मला तो ८-९वीच्या वर्गात शिकणारा शाळकरी मुलगा वाटला . त्याच्या बाजूला त्याची आई बसली होती .मी न राहवून त्या मुलाला म्हणालो , " ये बाळा , जरा सरकतोस का रे तिकडे ! थोडी जागा देना बाळा मला बसायला .तो चकार शब्दाने मला काही न बोलता आपल्या झोपलेल्या आईला म्हणाला , " ये आये , जरा सरक की गं तिकडं . ती माऊली पण काsकूsन करता सरकली.मला एवढया गर्दीतही थोडीका होईना बसायला जागा मिळाली .मनात मी मला थोडी जागा करून देणाऱ्या त्या मुलाचेआणि त्या माऊलीचे आभार मानले . गाडी सुरू झाली होती .मी पांडुरंगाला हात जोडले , म्हणालो , "हे पांडुरंगा ,घेतलीस रे बाबा माझी काळजी .हे माझ्या विठू आई माऊली .तू दयाळू आहेस .एखाद्या लेकराच्या आईसम - - नोव्हे आई बनून तू माझी काळजी घेतलीस - -घेतोस . दुसरी कडे ज्या मुलाने मला बसायला जागा दिली होती. त्या आधी पासून त्याच डब्यात ४- ५ टपोरी पोरं प्रवास करत होती .त्यातली काही दरवाजात बसली होती , काही उभी होती . त्यातील एक तरूण टपोरी मुलाने मला बसायला जागा देणाऱ्या मुलाच्या डोक्यात अचानक चापट मारली . तो दचकून जागा झाला . तोही काही कमी नव्हता .हातवारे करीत रागारागाने त्याला म्हणाला, " क्यों मारा रे मुझे ! क्या किया मैंने , I " आवाज चढवत तो त्या मुलाला म्हणाला , "

क्यों बे साले ! ज्यादा शान पट्टी दिखाता है क्या I

साले , जब मैंने तुझे उधर खसकने को बोला तो तू साले नहीं खसका Iअब जब ये अंकल आए है तो तूने बिना कुछ बोले उनको जगह दे दिया I साले आदमी है कि जानवर I "

" मैं आदमी नहीं है , और जानवर भी नहीं है Iइतना भी नहीं जानता कि मैं एक लडका हूँ " तो निरूत्तर झाला त्याला काय बोलावे ते सूचेना .रागाने तो त्याला म्हणाला .

" हाँ,मालूम है मुझे Iज्यादा मत सीखा ,नहीं तो दूँगा एक खिंचके समझे I "

दोघात आणखी वाद नको म्हणून मीच त्या भांडण उकरून काढणाऱ्या गुंड प्रवृत्ती सारख्या दिसणाऱ्या मुलाला म्हणालो , " ये मेरे भाई , झगडा मत कर |लो ,मैं उठ जाता हूँ I आप बैठ जाइए I मुझे पंढरपूर जाना है Iदो -चार घंटे का तो सफर है I " असे म्हणून मी उठलो ही होतो.पण तेवढयात तो माझ्या खांदयावर हात ठेवत मला प्रेमाने म्हणाला , "नहींs नहींss अंकल ऐसी कोई बात नहीं है Iआप बैठ जाइए Iआपके आनेसे पहले मैंने इसको उधर थोडा खसकने को बोला था Iसाला नहीं खसका I अब जब तुम आए तो खसका I मुझे गुस्सा तो आएगा ही ना I " त्याने माझ्या खांद्यावर ठेवलेला हात मी बाजूला करत त्याला म्हणालो , "गाली मत दो ,आपको बैठने का है तो बैठ जाओ ना I झगडा किस बात का I " मी असं म्हणाल्या बरोबर दरवाजात बसलेला त्याचा एक साथीदार त्याला म्हणाला . "ये राजू ! जाने दे ना यार ,कायकू झगडा करताय | आजा इधर दरवाजे पे तेरकू हम जगह करके देते है I ये खसक रे दिल्या उधर" गाडी चालू होती . भांडण मिटले होते .माझ्या पांडुरंगाने ते मिटवले होते .मी पांडुरंगाला म्हणालो , " हे पांडुरंगा , " अजब तुझा खेळ रे ,अजब तुझी लीला .तू आहेस म्हणून माझ्या जगण्यास अर्थ आहे . तू नसतास तर माझे जीवन निरस झाले असते .माझ्या विठ्ठला तू खरच दयाळू आहेस . तुला जीव लावला की तू हजार पटीने जीव लावतोस. "मला झोप आली होती .डोळे माझे एक सारखे पेंगायला लगाले होते .थोड्याशा जागेत मी बसल्या बसल्या झोपू शकत नव्हतो . प्रवाशांच्या जायच्या यायच्या जागेत थोडी जागा शिल्लक होती.टॉवेल अंथरूण डोक्याखाली उशाला बॅग घेवून झोपायच्या बेतात होतो .माझ्या डोक्याच्या बाजू कडून माझ्या डोक्याला डोक लावून दुसरा एक मुलगा झोपला होता . आजोंबा सोबत तो प्रवास करत होता . त्यांनाही पंढरपूरला उतरायचे होते. झोपण्या पूर्वी मी त्यांना सहजच म्हणालो , " बाबा ,पंढरपूर आले की हाक मारसाला का ? . "हो s हो s हाक मारतो की .कुठनं आलासा पाव्हणं . "

मी म्हणालो, " कोल्हापूरहून "

" पांडुरंगाच्या दर्शनाला चाललायसा व्हय ! "

मी 'हो 'म्हणालो नी झोपी गेलो. ते पण तिकडे संडासच्या बाजूला जे बेसीन असते त्या ठिकाणी बसल्या - बसल्या झोपी गेले .इकडे झोपण्या पूर्वी मी ही पांडुरंगाला मला पंढरपूर आले की उठव असे म्हणून झोपी गेलो .अचानक बाबांच्या आवाजाने आणि एकच वेळी दरवाजात बसून प्रवास करणाऱ्या त्या टवाळखोर मुलांच्या "पंढरपूर आया ,पंढरपूर आया जागो s जागोssपंढरपूर आया ,जागो ,जागो Iबाहेर प्लॅटफॉर्म वरून , चायवाले ,गरमागरम चायवाले ,चाय s,चाय ,चाय,चाय चायss ,चायss वाले , कॉफी sकॉफी वाले ss वडापाव वाले s., गरमा गरम ssभजीवाले sssसमोसावालेss आवाजाने मला जाग आली . बाहेर येऊन घडयाळात पाहिले तेव्हा पहाटेचे चार वाजले होते .स्टेशनवर उतरून बाहेर रिक्षा स्टॅण्डवर येऊन मी थांबलो .एका रिक्षावाल्याने मला विचारले , "माऊली मंदिरात जायचेय ना .बसा २० रुपये सीट आहे .डायरेक्ट मंदिराजवळ सोडतो . रिक्षा सहा आसनी होती .कोल्हापूरहून येताना मी ज्या डब्यातून प्रवास करत होतो योगायोगाने त्याच डब्यातून गडहिंग्लज हून आलेले काही वारकरी प्रवास करत होते. रिक्षात त्यांची नि माझी चांगलीच ओळख झाली . हरी नारायण पाटील रिटायर्ड मिलीटरी मेन , दुसरे शंकर पाटील तिसरे शहाजी बाबू सरनाईक . तिघेही एकमेकांचे जिगरी दोस्त . दरवर्षी पांडुरंगच्या दर्शनाला येतात. गप्पांचा नादात मंदिर केव्हा आले ते मलाच कळले नाही . रिक्षातून उतरल्या वर बॅग कुठे ठेवायची या विवंचनेत मी होतो. आम्ही मंदिराच्या दिशेने चालत चाललो होतो .चालता -चालता मी शंकर पाटलांना म्हणालो , " भाऊ ,एक विचारू ? "

" विचाराना . "

" आपण दर्शनाला चाललोय खरं पण बॅगा कुठे ठेवायच्या? "ते शांत पण हळू आवाजात मला म्हणाले " आहेत माझ्या ओळखीचे एक दुकानदार त्यांच्या दुकानात ठेऊ या . आम्ही जेव्हा -जेव्हा पंढरपूरला येतो तेव्हा -तेव्हा बॅगा येथेच ठेवून मग पुढे दर्शनाला जातो .ऐकून मी निर्धास्त झालो .बॅगा दुकानात ठेवून आम्ही थोडे पुढे जावून मस्त गरमा - गरम चहा घेऊन मंदिराच्या दिशेने चालू लागलो .मंदिराच्या बाहेर रस्त्यावर बरेचशे हारवाले हार विकत बसले होते .एक हारवाल्याने मला हाक मारली , " ओ माऊली , मंदिरात जाताय नव्ह तवा हा हार घेऊनशान चला .माऊलीच्या दर्शनला चाललायला असं रिकाम्या हातानं जाऊ नये . " मी नको म्हणून पुढे निघालो . मंदिरात हार विकत घेऊ हा विचार करून मी तो हार विकत घेतला नव्हता .मंदिरात पांडुरंगाची सेवा चालू होती .साडेपाच नंतर हळूहळू लाईन पुढे सरकत होती .सहा वाजून गेले .माझी एक सारखी नजर हारवाला कुठे दिसतो का तिकडे खिळून होती.हारवाला काही केल्या मला कुठे दिसत नव्हता .माझे मन बेचैन झाले होते . मनाची माझ्या द्विधावस्था झाली होती .काय करू ,परत पाठीमागे फिरून हार आणायला जाऊ का ?मी काही केल्या पाठी मागे जाऊ शकत नव्हतो कारण मी खूप पुढे आलो होतो . खूप पुढे आल्यामुळे पाठीमागे फिरू शकत नव्हतो .लाईन भराभर पुढे सरकत होती .मी कसली तरी काळजी करतोय हे हरी भाऊ पाटील यांनी जाणले . ते मला म्हणाले , "माऊली,तो बघा ,त्या कोपऱ्यात एक हार वाला दिसतोय . हारच हवाय ना तुम्हाला . "

मी म्हणालो , " बघू कुठे sकुठे ? " गर्दीमुळे मला निटसे काही दिसत नव्हते . जवळ गेल्यावर माझी घोर निराशा झाली . तुलशीला एक गुलाब बांधून ते तो विकत होता.जवळ आल्यावर मी १०रुपये देऊन ते गुलाबाचे फुल विकत घेतले .मी न राहवून त्या फूल विक्रेत्यास म्हणालो , " माऊली ,हार आहे का हो ? "

" नाही,असता तर दिला असता .मला ठेवून काय करायचय . "

"नाही तस नाही ,मला हार हवा होता . पुढे कुठे मिळेल का ? "

" नाही ,बाहेर मिळेल. "

मी आश्चर्याने त्याला म्हणालो , " काय बाहेर जाऊ ! "

"त्या शिवाय पर्याय नाही माऊली . "

माझा पुन्हा भ्रम निराश झाला ,मन खट्ट झाले .काय करावे मला स्वतःलाच काही सूचेनासे झाले .इतक्या लांब येऊन आपण पांडुरंगाला हार न घालता जाणार या गोष्टीचे शल्य मनाला एक सारखे बोचत होते . मला धीर दिला तो शंकर पाटील यांनी . धीरगंभीर होत मला ते म्हणाले, " माऊली ,कशाला चिंता करता .पांडुरंग बघून घेईल .कुठे ना कुठे तुम्हाला हार मिळेलच की . "

मी म्हणालो , " अहो कधी मिळणार . इथे तर एकपण हार वाला नाही . "माझ्या पाठीमागे हरी पाटील उभे होते ते मला त्यांच्या मिलीटरी स्टाईलने मला म्हणाले , "चिंता छोडो़ माऊली और आगे बढते रहो वो है ना तुम्हारा विठोबा सब कुछ देख रहा है | इधर आए हो तो चिंता नाय करने का ? " जसा - जसा मी पांडुरंगाच्या जवळ येऊ लागलो तस -तसे माझे मन आणखीनच बेचैन होऊ लागले .मी मनात पांडुरंगाचा धावा केला , " हे पांडुरंगा , मी काय करू रे ! कुठून हार आणू तुझ्या साठी ?कोण आणून देणार मला हार ?मला मार्ग दाखव .तुला हार घातल्या शिवाय मी जाणार नाही . लाईनीत असताना मी सहज खाली डोकावून पाहिले खाली रस्त्यावर मला एक हारवाला दिसला .मी त्याला हाक मारली पण माझी हाक काय त्याच्या कानापर्यंत पोहचत नव्हती . मी शुकsशुकss केले पण त्याचाही काही उपयोग होत नव्हता . शेवटी मी जीव खाऊन मोठयाने हाक मारली , " ओsमाऊली ,ओs माऊली त्याने वर पाहिले .मी म्हणालो , " दोन हार वर पाठवा . "त्याचे उत्तर निराशा जनक होते . "पाठवले असते पण माणूस नाहीये हो . " मी पुन्हा मोठ्याने ओरडलो , " अहो माऊली ,असं काय करता प्लीज पाठवा ना " माझ्या पाठीमागचे दर्शनार्थी ओरडायला लागले . " अहो माऊली चला ना पुढे .म्होरं बघून चला की आता हार तुम्हास्नी नाय गावणार .चला व्हा म्होरं .नायतर आम्हास्नी जाऊ दया ." नाईलाजास्तव मी पुढे सरकलो .एक आशा होती ती पण संपली होती .माझे डोळे पानावले .माझा जिव रडकुंडीला आला .मी अगदी पांडुरंगाच्या जवळ आलो होतो .अगदी दहा -पंधरा पाऊलवर - - - - पांडुरंग माझ्याकडे पाहून हसत होता . माझा चेहरा रडवेला झाला होता .माझ्या पाठीमागे मुख दर्शनाची लाईन होती .तिथेही गर्दी होती .काही भाविक हात जोडून डोळे मिटून पांडुरंगाला मनोभावे प्रार्थना करत होते .मी पुढे सरकायला लागलो होतो .तेवढ्यात मुख दर्शनाच्या लाईनीतून .माझ्या पाठीमागून माझ्या खांदयाला कुणी तरी स्पर्श करतोय हे मला जाणवले .मी पाठी मागे वळून पाहिले .एक गोरापान मुलगा मला हाक मारत मला म्हणाला , " ओ sभाऊsएवढा हार घाला ना माझ्या माऊलीच्या गळ्यात .मी क्षणभर आवाक झालो . 'हो मी घालतो ' असे म्हणालो , नि त्याने माझ्या हातात तुळशीचा हार दिला .हार खूप सुंदर होता .एक वेळ मी पांडुरंगाकडे पाहिले आणि एकवेळ मी मागे वळून पाहिले. तर काय - - - तो मुलगा गायब .मी पांडुरंगाचे दोन्ही चरण घट धरून ठेवले होते .माझ्या डोळ्यातून अश्रू केव्हा बाहेर पडले ते माझे मलाच कळले नाही .


लेखक - अशोक कुमावत

भ्रमणध्वनि - ९९६९५८४९६६

मुंबई -मालाड (पूर्व )

Email.: ashokkumawat010@gmail.com



विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

303 views1 comment

Recent Posts

See All
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page