top of page

मराठी भाषा आणि कुसुमाग्रज



नमस्कार, मी कविता पाटणकर, २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्म दिवस. मराठी राजभाषा, गौरवदिन म्हणून आपण साजरा करतो. विश्वातील सर्व भारतीयांना मराठी राजभाषेच्या, गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

आपला भारत देश विविधतेने नटलेला आणि विविध भाषांनी समृद्ध बहरलेला आहे. भारतातील प्रमुख बावीस भाषांपैकी ‘‘पंधरावी आपली मराठी भाषा आहे. मराठी भाषा संस्कृत भाषेपासून निर्माण झाली असून तीला दोन हजार वर्षांपासूनचा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वरांनी तिची पायाभरणी केली, व संत तुकाराम महाराजांनी अभंग रचून भरभराट केली आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला वैभव प्राप्त करून दिले. त्यानंतर भारतावर अनेक आक्रमणे झाली. ब्रिटीश राजवट आली आणि मराठी भाषेला उतरती कळा लागली. साहित्यकार-कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले, म्हणूनच कवी सुरेश भटांच्या गीतानुसार ‘‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी!!

३०-३५ वर्षापूर्वी महाराष्ट्रातील नागरीकांना व्हिसा काढण्याकरीता ‘‘ओळखपत्र’पुरावा म्हणून ग्राह्य असलेले ‘‘रेशनिंग कार्ड’दिल्याचे त्यांना नक्कीच आठवत असेल. त्या रेशनिंग कार्डच्या पाठीमागे कवी कुसुमाग्रज यांची कविता छापली असून महाराष्ट्र शासनाने कुसुमाग्रज यांना आपले कुटुंब सदस्य म्हणून अढळ स्थान दिले आहे. आपला देश पन्नाशीत स्वातंत्र्य सुवर्ण महोत्सव साजरा करण्यापूर्वी ‘‘स्वातंत्र्य देवीची विनवणी’ही २२-२३ कडव्यांची अर्थपूर्ण कविता प्रसिद्ध झाली आहे. परंतु सध्या रेशनिंग कार्डचा उपयोग होत नसल्याने, व पूर्वी वापरात असतानाही लक्षपूर्वक वाचली नसल्याने, आणि आता कपाटबंद असलेल्या रेशनिंग कार्डवरील (काही कडव्यांचे) कवितेचे स्मरण करत आहे.


पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका!! गोर गरीबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका, गुणी जनांवर जळू नका, उणे कुणाचे दिसता किंचित, दवंडी देत फिरु नका! मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका!! पर भाषता ही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका ! भाषा मरता देश ही मरतो, संस्कृतीचा दिवा विझे, गुलाम भाषिक होऊनी आपल्या प्रगतीचे शीर कापू नका! मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका!!

करा कायदे परंतु हटवा जहर जातीचे मनातुनी, एकपणाच्या मारूनी बाता ऐन घडीला चळू नका! समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खोडू नका, दासी म्हणूनी पिटू नका, वा देवी म्हणूनी भजू नका! मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका!!

नास्तिक, आस्तिक असा कुणीही, माणूसकीतच देव पहा, उच्च निच हा भेद घणास्पद, उकिरड्यात त्या कुजवू नका! अज्ञानाच्या गळ्यात, माळा अभिमानाच्या घालू नका, अंध प्रथांच्या कुजट कोठडी, दिवा भिता सम दडू नका ! मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका!!

जुनाट पाने गळूनी, पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा, एकवीसावे शतक समोरी, सोळाव्यास्तव रडू नका! माणूस म्हणजे पशू नव्हे, हे ज्याच्या हृदयात ठसे, नर नारायण तोच असे! लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरु नका! मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका!!

हि कविता आजच्या काळात ही आपल्याला तंतोतंत लागू पडते. थोडा फार फरक पडला आहे, पण अजून खूप पुढे जायचे आहे.


आता २१व्या शतकात मराठी पूर्ण वाक्य लिहिताना हिंदी इंग्रजी शब्द चपखलपणे बसलेले आहेत म्हणजे ‘‘चल क्रॉस करू, स्टेशनला जाऊ’आताचे नविन उदाहरण म्हणजे व्हाट्‌सॲप वर इंग्रजीमधे ‘‘खूपच छान’मराठीत टाईप न करता “Khuach Chan” असे लिहितो. अशी खूप उदाहरणे आहेत. याचा अर्थ मराठी भाषा हिंदी इंग्रजीमध्ये पसरत चालली आहे. या नविन पिढीने आपली मराठी जागतिक स्तरावर पोचविली आहे. हे खूप महत्वाचे आहे. प्रत्येक गाव कुसावर भाषा बदलते. प्रत्येकाला आपल्या मातÀभाषेचा अभिमान असतोच. मराठी सोबत इतर भाषांचाही आदर केला पाहिजे. मी जगात कुठेही फिरते, शिवाय मला व्याकरण इंग्रजी येत नसल्याने हिंदी किंवा मराठीतून बोलते. मी ही भारतीयांना शोधतच फिरत असते. त्यांनाही ‘‘आपलं माणूस’भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत असतो. अगदीच कोणी न भेटल्यास कामचलावू इंग्रजी हातवारे करून (भारतीय पद्धतीने) त्यांना समजेल इतपत बोलते या बाबतचा लंडन मधील किस्सा लिहिते. आम्ही टॅक्सी करून हॉस्पिटल जवळ उतरलो तर माझा जावई अनिकेत समोर उभा! मी पटकन टॅक्सी ड्रायव्हॅरला सांगितले ‘‘ही इज माय जावई’!! त्यांनी लगेच हात मिळविला. (गुड मॅनर्स) अनिकेतने त्यांना इंग्रजीतून सांगितले. तर ते लगेच म्हणाले ‘‘हाँ जावई है आप’! आणि आम्ही रस्त्यातच मोठ्याने हसायला लागलो. पु.ल.देशपांडेच्या भाषता आपल्याला मोठ्याने हसण्या-बोलण्याची सवचय आहे. ड्रायव्हरही हिंदी भाषिक असल्यामुळे सवयीनुसार टॅक्सीत बडबड सुरुच होती.


माझी नात निक्की वय वर्ष पाच. लंडनलाच आहे. ती मराठी बाराखडी सुंदर हस्ताक्षरात लिहिते. शुभंकरोती, गणपतीस्तोत्र बोलते. योगा करते. मी लंडनला जाताना मराठी मुळाक्षरे, अंकलिपी, वस्तू, फळे, भाज्या, फुले यांची चित्र पुस्तके घऊन जाते. आम्ही सामान आणायला किंवा फिरायला गेल्यावर वस्तू, फळे, भाज्या फुले यांची नावे मी तिला मराठीत शिकवते आणि ती बोलते सुद्धा. उदाहरण देते, तिला पोस्ट बॉक्स दाखविल्यावर विचारले तर छानपैकी उत्तर देते ‘‘टपालपेटी’लाईम दाखविले तर म्हणते ‘‘ईडीलिंबू’’! अशा प्रकारे तिलाही बोलायला मजा येते तर मला मराठी शिकवण्याचा आणि ती शिकण्याचा आनंद मिळतो. आपल्या मराठी भाषेला तिसऱ्या पिढीत पोहोचविण्याचे व जगभर मराठी भाषा पसरविण्याचे काम आपणच केले पाहिजे.

जर्मनीतील माझा जर्मन भाचा योगी मी तिकडे गेल्यावर मराठीतून सांगतो, ‘‘मावशी तू मला मोदक आणि पुरणपोळी दे.’मी पण त्याला मोदक आणि पुरणपोळी प्रेमाने आणि आनंदाने दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून जीभ वळत नसतानाही मराठी बोलण्याचा त्याचा प्रयत्न आणि उच्चार ऐकून पाहून मी धन्य होते आणि याचा मला खूप अभिमान आहे. म्हणूनच माझी ‘‘माय मराठी’साता समुद्रापार पोहोचली आहे याची खात्री पटते. आपणच आपली मराठी भाषा नदीसारखी सतत वाहती ठेवल्यास ती कधीच लुप्त होणार नाही.




श्रीमतीकविताभगवानपाटणकर,

पत्ताः३/११०१, चक्रवर्तीअशोकहौ.सो.,

तरुणभारतरोड, चकाला, अंधेरी (पूर्व),

मुंबई - ४०००९९.

मोबाईलः९८१९८०६८६४

Email.: patankarkavita1957@gmail.com



विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

571 views0 comments
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page