विश्व मराठी परिषद

Aug 14, 20201 min

आम्ही शेतकऱ्यांची औलाद


 
कष्ट करून थकल्या जिवाची
 
ऐका हो कोणी ही कहाणी
 
आम्ही शेतकऱ्याची औलाद
 
नाही करणार कुणाची पायधरणी
 

 
झाली नांगरणी आणि केली पेरणी
 
आणखी किती करावी धडपड
 
झाली झोळी फाटकी आता
 
अन खिशालाही पडलं भगदड
 

 
टाचा झिजल्या केसही गेले
 
वाहून काळ्या आईच्या सेवेत
 
आम्हालाही पाहिजे धान्य रुपी अमृत
 
किती राहावं गरिबांच्या रांगेत
 

 
पावसाचं म्हणाल तर आता
 
कशाला काढू दुखावरच्या खपल्या
 
कोण देतं आमच्या मालाला भाव
 
नुसत्याच आश्वासन देणाऱ्या बाहुल्या
 

 
आम्हाला म्हणती जग सगळे
 
जगाचा पोशिंदा अन बळीराजा
 
आम्ही खातो शिळी भाकर
 
तरी नाही राहणार उपाशी प्रजा
 

 
चालणं आता भाग आहे
 
थकल्या जरी येथे वाटा
 
आलं नाही पीक जरी
 
मेहनतीनेच काढायचा काटा
 

 
झालं जरी कर्ज डोक्यावर
 
तरी जीव मात्र देणार नाही
 
नको सरकारची भीक आम्हाला
 
पाठीचा कणा वाकणार नाही
 

 
दिवसरात्र वावरात राबून
 
काढू आम्ही कष्टाचे मोती
 
मातीशी नाळ आहे आमची
 
अन पशु पक्षी हीच नाती
 

 
कोपला जरी निसर्ग तरी
 
सुटली नाही आमची आशा
 
या मनगटात आहे भरलेली
 
उज्वल भविष्य पेरायची नशा
 

 
रडायचं नाही शेतकरी मित्रांनो
 
आता आपल्याला फक्त लढायचं
 
नशीब असो की अपयश
 
त्याला आता फक्त गाडायचं
 

 
शरीर पोळणाऱ्या उन्हाची
 
आता सवयच झाली आहे
 
झालो जरी जर्जर तरी
 
पुन्हा उठण्याची उर्मी आहे
 

 
आले जरी वाटेत तुफान
 
तरी आता माघार नाही
 
वादळांना घाबरून फिरणं
 
पावलांनाही पसंत नाही
 

 
सांगतो आता छाती ठणकावून
 
नशिबा दाखव तू पण तुझा माज
 
आम्ही कास्तकरी आहोत तयार सदा
 
घुमणार फक्त आमचाच आवाज
 

 
नशिबा तुझे भरले दिवस
 
आता माझ्याशी आहे गाठ
 
तुला ठेचून काबाडकष्टाने इथेच
 
रोवणार झेंडा छातीत ताठ
 

 
ढासळला जरी बुरुज आमचा
 
तरी निधड्या छातीची ढाल आहे
 
आज जरी दिवस आम्हाला लुटणाऱ्यांचा
 
तरी येणारा शेतकऱ्याचाच काळ आहे


 

कवी: निलेश बाळासाहेब पाऱ्हाटे (शिरूर, पुणे)
 
मो: 9665966186

ईमेल: nilesh.parhate1@gmail.com

    2100
    10